Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
भारतीय महिलांनी क्रिकेटमध्ये सुवर्णपदक जिंकले.केला श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव
हँगझोऊ येथे सुरू असलेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक पटकावले.
मुंबई : गुरुदत्त वाकदेकर
आज 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा अंतिम फेरीत श्रीलंकेशी सामना झाला. हा सामना जिंकून टीम इंडियाने प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे. भारताने पहिल्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला होता, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत श्रीलंकेने गतविजेत्या पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव करून अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले होते. कांस्यपदकाच्या लढतीत बांगलादेश संघाने पाकिस्तानचा पराभव केला. सुवर्णपदकाच्या लढतीत भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 117 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संघ आठ गड्यांच्या मोबदल्यात 97 धावाच करू शकला.
हँगझोऊ येथे सुरू असलेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. सुवर्णपदकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर 117 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने 20 षटकांत सात गडी गमावून 116 धावा केल्या. स्मृती मंधानाने सर्वाधिक 46 धावांची खेळी खेळली. तर जेमिमा रॉड्रिग्जने 42 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 97 धावाच करू शकला. अशा प्रकारे टीम इंडियाने अंतिम सामना 19 धावांनी जिंकला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. शेफाली वर्मा 15 चेंडूत 9 धावा करून बाद झाली. यानंतर स्मृतीने जेमिमासोबत दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. रणवीराने ही भागीदारी तोडली. तीने मंधानाला बाद केले. मंधानाने 45 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 46 धावांची खेळी केली. त्याचवेळी ऋचा घोष नऊ धावा करून बाद झाली आणि कर्णधार हरमनप्रीत कौर दोन धावा करून बाद झाली आणि पूजा वस्त्राकर दोन धावा करून बाद झाली. जेमिमाह रॉड्रिग्जने 40 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 42 धावांची खेळी केली. दीप्ती आणि अमनजोत प्रत्येकी एक धाव काढत नाबाद राहिले. श्रीलंकेकडून उदेशिका प्रबोधनी, सुगंधिका कुमारी आणि इनोका रणवीराने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या संघाची सुरुवातही खराब झाली. टिटस साधूने चमकदार कामगिरी करत चामरी अटापट्टू (12), अनुष्का संजीवनी (1) आणि विश्मी गुणरत्ने (0) यांना झटपट तंबूमध्ये पाठवले. यानंतर हसिनी परेरा आणि निलाक्षी डी सिल्वा यांनी चौथ्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केली. पूजाने निलाक्षीला (23) बाद करून ही भागीदारी भेदली. राजेश्वरीने हसिनीला (25) बाद केले. दीप्तीने ओशादी रणसिंघे (19), देविका वैद्यने कविशा दिलहरी (5) याला बाद केले आणि राजेश्वरीने सुगंधिका कुमारीला बाद करत श्रीलंकेच्या आशा संपुष्टात आणल्या. भारताकडून टिटसने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर राजेश्वरीने दोन गडी बाद केले. दीप्ती, पूजा आणि देविका यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
रिपोर्टर