Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
मुरलीधर मोहोळ महापौर आणि चंद्रकांत दादा पाटील पुण्याचे "कारभारी" झाल्यानेच पुणे महानगरपालिकेत सामान्य नागरिकाला किंमत राहिली नाही : उमेश चव्हाण
पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील रस्ते आणि रस्त्यावरील खड्डे, वीज, ड्रेनेज, पाणी, ट्रॅफिक जाम यामुळे पुणेकर नागरिक कमालीचे त्रस्त झालेले आहेत. पुणे महानगरपालिकेची सत्ता आम्हाला द्या, पुणेकर नागरिकांना अभिमान वाटेल असा पुण्याचा विकास करू अशी मखलाशी करणारा प्रचार केला. भाजपच्या काळामध्ये पुण्याचा फारच मोठा अगदी अमेरिकेसारखा विकास होणार आहे, अशा पद्धतीची मोठ-मोठी आमिषे दाखवून पुणेकरांचे प्रश्न लगेचच सुटतील, असे सांगितले खरे मात्र पुणेकरांच्या पदरी घोर निराशाच पडली. काल इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या परिश्रमामुळे चंद्रयान चंद्रावर पोचल्याचे श्रेय घेणाऱ्या भाजपला चंद्रावरचे खड्डे दिसतील. माती आणि धूळही दिसेल, मात्र पुणेकर नागरिक अडचणीत- संकटात असल्याचे त्यांना कधीच दिसणार नाही, याबद्दल पुणेकरांना भाजपच्या खोटारडेपणाबद्दल पूर्ण खात्री झालेली आहे.
मुरलीधर मोहोळ महापौर आणि चंद्रकांत दादा पाटील पुण्याचे कारभारी झाल्यानेच पुणे महानगरपालिकेमध्ये सामान्य नागरिकाला किंमत राहिली नाही, असे परखड व निर्भिड मत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
उमेश चव्हाण म्हणाले की, दररोज सार्वजनिक समस्यांना तोंड देणाऱ्या पुणेकर नागरिकांना जेव्हा स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या हॉस्पिटल मधील उपचाराच्या, शस्त्रक्रियेच्या वेळी निर्माण होणाऱ्या संकटाला तोंड द्यावे लागते, तेव्हा त्याच्यासाठी दिलासादायक असणारी एकमेव योजना म्हणजे पुण्याची शहरी गरीब योजना आहे. मात्र या 'शहरी गरीब योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकाला मिळूच नये', अशा पद्धतीच्या अटी आणि नियम घातल्याने उपचार घेत असलेल्या रुग्णावर व त्याच्या नातेवाईकांवर आत्महत्या करण्याचीच पाळी आली आहे.
पुण्याचा विकास होईल तेव्हा होईल किंवा या जन्मी होणार आहे की नाही? तेही कुणाला सांगता येणार नाही. मात्र आपल्या घरात आलेल्या आजारपणाच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात सुरू झालेली शहरी गरीब योजना आता मरणासन्न आणि संपण्याच्या अवस्थेवर पोहोचलेली आहे.
शहरी गरीब योजना जगली तर रुग्ण जगेल, हे माजी महापौर आणि उद्याचे खासदार होऊ पाहणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांनी लक्षात घेतले पाहिजे. शहरी गरीब योजना फक्त कागदोपत्री जिवंत ठेवायची आहे, हे भयंकर वेदनादायी वास्तव पुणेकर नागरिक दररोज भोगत आहेत. रुग्णांना जगवण्यासाठी आम्ही काहीतरी करतोय? असं भासवण्यासाठी पुणे मनपाचे अधिकारी काम करतायेत की काय? ही इतकी साधी गोष्ट समजायला तयार नसलेल्या मुरलीधर मोहोळ यांना कशाच्या आधारे 'खासदार' म्हणून निवडून येण्याचे 'स्वप्न' बघावेसे वाटत आहे? हे अयोध्येच्या ऐतिहासिक मंदिरातील श्रीरामालाच माहीत? अशी आरोग्याची 'राम भरोसे' परिस्थिती पहिल्यांदाच पाहिली असल्याचे आता पुणेकर रुग्ण म्हणत आहेत.
1000 स्क्वेअर फुटाचे घर जर नावावर असेल तर शहरी गरीब योजनेचा लाभ मिळणार नाही. या जाचक अटीच्या बरोबरच ज्या दिवशी योजनेचे कार्ड काढले आहे त्या दिवशी पासूनचेच बिल ग्राह्य धरण्यात येईल, असे जाहीर करून खाजगी आणि धर्मादाय हॉस्पिटल वाल्यांना रुग्णाला लुटायचा परवानाच महानगरपालिकेकडून दिला जातोय, हे चंद्रकांत दादा तुम्हाला दिसत नाही का? शहरी गरीब योजनेचे सभासद कार्ड रद्द जरी केले तरी कार्ड काढताना पुणे मनपाकडून लोकांचे घेतलेले दोनशे रुपये परत दिले जात नाहीत, हाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळातील तुघलकी निर्णय आहे, हा असा अनुभव गरीब नागरिक दररोज घेत आहेत. एकाच वेळी ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आणि पुन्हा ऑफलाईन सुद्धा कागदपत्रे मागायची, ही भंकस कल्पना फक्त पुणे महानगरपालिकाच करू शकते. शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी सगळा दिवस ताटकळत काढावा लागतो, या योजनेचे कार्ड काढण्यासाठी जो रांगेत उभा राहतो त्याचे प्रचंड हाल होतात. एकदा शहरी गरीब योजनेचे कार्ड काढण्यासाठी 'खासदार' बनू पाहणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या आई - पत्नी किंवा बहिणीला त्या रांगेत उभे करावे आणि त्यांच्या तोंडूनच हा अनुभव ऐकावा, म्हणजे त्यांना पुणे महानगरपालिकेत लोकांना मदत व्हायचे तेव्हाचे पूर्वीचे दिवस आणि आताचे लोकांची वाट लागत असणारे दिवस यातील फरक कळेल, कारण आपल्या रुग्णाला काहीतरी मदत मिळेल या आशेने रांगेमध्ये उभ्या असलेल्या आया - बहिणींचे हाल कदाचित खासदारकीचे स्वप्न रंगवण्याच्या नादात मुरलीधर मोहोळ यांना दिसत नसावे, असेच आता रांगेत उभे राहिलेले पुणेकर नागरिक म्हणत आहेत.
रुग्णांच्या प्रश्नाशी त्यांच्या भावनांशी जर असेच खेळत राहिलात तर मुरलीधर मोहोळ तुम्ही आयुष्यात कधीच खासदार होणार नाही. अशा 'डबघाईच्या' काळात चंद्रकांत दादा तरी अजून किती दिवस पुण्याचे कारभारी राहणार आहेत, हे अजित पवारांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनालाच माहीत मात्र तरीही भाजपच्या 100 नगरसेवकांनी रुग्णांच्या प्रश्नांकडे असेच दुर्लक्ष केले तर 100 नगरसेवक सोडूनच द्या यापुढे दहा सुद्धा नगरसेवक निवडून येणे कठीण होईल, असे देखील रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.
रिपोर्टर