Breaking News
२४ प्राईम व्हिजन न्युज.
भारताची आयर्लंडवर 33 धावांनी मात, रिंकू-दुबेने शेवटच्या दोन षटकात 42 धावा केल्या
मुंबई : गुरुदत्त वाकदेकर
भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी20 मालिकेतील दुसरा सामनाही भारतीय संघाने 33 धावांनी जिंकण्याबरोबरच भारताने मालिकाही जिंकली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकात 185/5 धावा केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ आठ गडी गमावून केवळ 152 धावा करू शकला आणि सामना 33 धावांनी गमावला.
भारताकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 58 धावा केल्या. संजू सॅमसनने 40 आणि रिंकू सिंगने 38 धावांचे योगदान दिले. आयर्लंडकडून बॅरी मॅकार्थीने दोन बळी घेतले. आयर्लंडकडून अँड्र्यू बालबर्नीने 72 धावा केल्या. बालबिर्नीशिवाय केवळ मार्क अडायर (23), कर्टिस कॅम्फर (18) आणि जॉर्ज डॉकरेल (13) यांना दुहेरी आकडा गाठता आला. भारताकडून जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. अर्शदीप सिंगने एक विकेट घेतली.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. जयस्वाल आणि ऋतुराज यांनी पहिल्या विकेटसाठी 22 चेंडूत 29 धावा जोडल्या. 11 चेंडूत 18 धावा काढून जयस्वाल पुन्हा एकदा क्रेग यंगचा बळी ठरला. आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो सीमारेषेजवळ कर्टिस कॅम्फरकरवी झेलबाद झाला. गेल्या सामन्यात खाते उघडण्यात अपयशी ठरलेला तिलक वर्मा या सामन्यातही अपयशी ठरला. तिलकला जॉर्ज डॉकरेलच्या हाती झेल देण्यास मॅकार्थीने भाग पाडले. 34 धावांवर दोन गडी गमावल्याने भारतीय संघ संघर्ष करत होता. यानंतर ऋतुराज आणि संजू सॅमसन यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघासाठी कंबर कसली आणि संघाची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली. संजू सॅमसन 26 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 40 धावा करून बाद झाला. बेंजामिन व्हाईटच्या ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो त्रिफळाचीत झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडही 43 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 58 धावा करून बाद झाला. या सामन्यात त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. मॅकार्थीच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात गायकवाडने टेक्टरच्या हाती झेल दिला. 129 धावांवर चार विकेट गमावल्यानंतर भारताची धावगती मंदावली. 18 षटकांनंतर भारताची धावसंख्या 143/4 होती. रिंकू सिंग आणि शिवम दुबे खेळपट्टीवर होते. यानंतर रिंकूने मॅकार्थीच्या 19 व्या षटकात दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 22 धावा केल्या. पुढच्या षटकात तीन षटकार मारले आणि 20 व्या षटकाच्या शेवटी भारतीय संघ 185/5 धावा करण्यात यशस्वी झाला. शेवटच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रिंकू सिंग मार्क एडायरचा बळी ठरला. रिंकूने 21 चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 38 धावा केल्या. त्याचवेळी, शिवम दुबेने 16 चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने 22 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. आयर्लंडकडून मॅकार्थीने दोन बळी घेतले. मार्क एडेअर, क्रेग यंग आणि बेंजामिन व्हाईट यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
186 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरुवात खराब झाली. कर्णधार पॉल स्टर्लिंग आणि लॉर्कन टकर खाते न उघडताच बाद झाले. दोन्ही विकेट प्रसिद्ध कृष्णाने घेतल्या. 19 धावांत दोन गडी गमावल्याने आयर्लंड दडपणाखाली आले. हॅरी टेक्टरही सात धावा करून रवी बिश्नोईचा बळी ठरला. यानंतर बालबिर्नीने कर्टिस कॅम्फरच्या साथीने संघाची धावसंख्या 50 धावांच्या पुढे नेली, पण कॅम्फरही 18 धावा करून बिश्नोईच्या गोलंदाजीवर बाद झाला. बालबिर्नीने जॉर्ज डॉकरेलसोबत उपयुक्त भागीदारीही केली आणि संघाची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली. त्यानंतर डॉकरेल गैरसमजाला बळी पडला आणि 13 धावांवर धावबाद झाला. यानंतर बालबिर्नीवर दडपण वाढले आणि वेगवान धावा करण्याच्या प्रयत्नात तोही अर्शदीपचा बळी ठरला. अर्शदीपने त्याला ऑफ स्टंपबाहेरील चेंडूवर सॅमसनकरवी झेलबाद केले. तो बाद होताच सामना जवळपास संपला होता. मात्र, मार्क अडायरने शेवटच्या षटकांत झटपट धावा करत संघाची धावसंख्या 150 धावांच्या पुढे नेली. जसप्रीत बुमराहने शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करत संघाला 33 धावांनी विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात बॅटने एकही धाव निघाली नाही, बाय स्वरुपात फक्त चार अवांतर धावा जोडल्या गेल्या. याच षटकात बुमराहने अडायरलाही बाद केले. या सामन्यातील विजयासह भारताने मालिकाही जिंकली आहे. रिंकू सिंगला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. आता बुधवारी होणारा सामना ही केवळ औपचारिकता आहे.
रिपोर्टर